✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड तालुक्यातील – देवसरी येथील पुनर्वसित नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बुधवार, दि. १७ जून २०२६ रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात पुनर्वसित नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मोर्चाची सुरुवात सकाळी ११.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात येणार आहे.

त्यानंतर मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते उपविभागीय अधिकारी कार्यालय, उमरखेड या मार्गाने काढण्यात येईल. मोर्चानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार असून, त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभा संपल्यानंतर मोर्चाचे शांततापूर्ण विसर्जन करण्यात येईल.मोर्चाद्वारे पुनर्वसनाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

प्रमुख मागण्यांमध्ये पुनर्वसनाची सर्व रखडलेली कामे तातडीने पूर्ण करणे, पुनर्वसित कुटुंबांना घरबांधणीसाठी लाभ देणे व उर्वरित लाभार्थ्यांना घरे मंजूर करणे, शुद्ध पाणी, अंतर्गत रस्ते व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच पुनर्वसन प्रकल्पातील कामांचा नियमित आढावा घेऊन प्रगती अहवाल नागरिकांसमोर सादर करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

या आंदोलनासाठी वामनराव सावते, गजाननराव देवसरकर, (उपसरपंच तथा संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड), तुळशीराम सावते,सुभाषराव सावते यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच अनेक मान्यवर व पुनर्वसित नागरिकांची उपस्थिती राहणार आहे. या मोर्चाचे निवेदन सौ. मीनाक्षी चंद्रमणी सावतकर (प्रशासक, ग्रामपंचायत देवसरी तथा अध्यक्ष, पुनर्वसन समिती देवसरी), उपस्थित प्रमुख मार्गदर्शक,महिला आघाडी यांच्या समवेत माननीय उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना देण्यात येणार आहे.

“पुनर्वसितांचे पुनर्वसन हेच आमचे मुख्य मिशन” या भूमिकेतून आंदोलन राबविण्यात येणार आहे.
देवसरीतील सर्व पुनर्वसित नागरिकांनी आपल्या हक्कांसाठी आयोजित या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती चंद्रमणी सावतकर यांनी दिली आहे.







