✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड:- शहरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा भयंकर लपंडाव सुरू असून, महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. “कोणताही उपअभियंता (डेप्युटी इंजिनिअर) आला, तरी परिस्थिती ‘पहिले पाढे पन्नास’ सारखीच राहते,” असा संतप्त सवाल आता उमरखेडचे नागरिक विचारू लागले आहेत. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचा संयम आता सुटत चालला आहे.

🔴 नुसत्याच बदल्या; ठोस उपाययोजना शून्य!
उमरखेड शहरात वीज पुरवठा सुरळीत करण्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) पूर्णपणे अपयशी ठरली आहे. खुर्च्या बदलतात, अधिकारी बदलतात, पण उमरखेडकरांच्या नशिबी असलेला अंधार काही संपत नाही. वीज ग्राहकांना नाहक मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असून, यावर कोणतीही ठोस किंवा कायमस्वरूपी उपाययोजना होताना दिसत नाही.

❓ मुख्य अभियंत्यांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष की डोळेझाक? या सर्व भोंगळ कारभारावर कोणत्याही राजकीय पक्षाचा वचक राहिलेला नाही, हे दुर्दैवी वास्तव आहे. त्यामुळेच महावितरणच्या अधिकाऱ्यांचे चांगलेच फावले आहे.
“विजेच्या या गंभीर समस्येकडे महावितरणचे मुख्य अभियंता जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत का?” असा थेट आणि रोकडा प्रश्न आता शहरातील संतप्त ग्राहकांनी उपस्थित केला आहे. वरिष्ठांना उमरखेडकरांच्या त्रासाचे काही देणेघेणे नाही का, असा सूर निघत आहे. तर लोकप्रतिनिधींनी मते कोणत्या तोंडाने मागायची? शहरातील या गंभीर परिस्थितीवर आता लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आमदार आणि खासदारांनी या विषयात स्वतः वैयक्तिक लक्ष घालण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे.

चौकट – जनतेची मागणी- आमदार आणि खासदारांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ धारेवर धरावे.

चौकट – अंतिम इशारा – उमरखेड शहराचा वीज पुरवठा तात्काळ आणि कायमस्वरूपी सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा वीज ग्राहकांनी दिला आहे. आता तरी महावितरणला जाग येणार की उमरखेडकरांना अंधारातच दिवस काढावे लागणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.







