✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड : शहरातील महागाव रोडवरील नव्याने सुरू झालेल्या ‘तुलसी टी पॉईंट’ हॉटेलमध्ये जेवणात किडा आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून तक्रार केल्यानंतर संबंधित ग्राहकाला मालक/मॅनेजरकडून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलीस वसाहत, उमरखेड येथील रहिवासी निलेश रंगरावजी राउत (वय ४१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते ११ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८.३० ते ९.३० दरम्यान कुटुंबासह तुलसी हॉटेल येथे जेवणासाठी गेले होते. जेवणादरम्यान दाल तडका मध्ये दगड आढळल्याचा प्रकार प्रथम घडला. त्यानंतर पनीर मसाला स्पायसी मागविल्यावर कच्च्या मिरच्या बारीक करून भाजीमध्ये टाकण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.दरम्यान, त्यांच्या ७ वर्षीय मुलाने भातात किडा दिसत असल्याचे सांगितले.

तपासून पाहिले असता तो शिजलेला किडा असल्याचे आढळून आले. याबाबत हॉटेल मालक/मॅनेजरला विचारणा केली असता त्यांनी उद्धट वर्तन करत फोटो काढण्यास मनाई केली व “तुमच्याकडून जे होते ते करा, लवकर निघून जा, नाहीतर बघून घेईन,” अशा शब्दांत धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे राउत कुटुंबाने अर्धवट जेवण सोडून बिल भरून हॉटेलमधून बाहेर पडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

सदर हॉटेलचे स्वयंपाकघर अत्यंत अस्वच्छ असल्याचा आरोपही करण्यात आला असून अशा प्रकारांमुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने संबंधित हॉटेलची तातडीने सखोल तपासणी करावी, तसेच परिसरातील सर्व हॉटेल, धाबे व रेस्टॉरंटच्या स्वयंपाकगृहांची विशेष तपासणी करून निकृष्ट व अस्वच्छ अन्न पुरविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नव्याने सुरू झालेल्या हॉटेलमध्येच असा प्रकार उघडकीस येणे गंभीर बाब मानली जात असून पोलीस प्रशासन व अन्न व औषध विभागाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.




