
(मुस्लिम समाजाचा लाईट बंद आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दि. ०१ मे २०२५) केंद्र सरकारच्या नव्या ‘वक्फ कायदा 2025’ विरोधात देशभरात संतापाचे वातावरण असून, मुस्लिम समाजाने एकत्र येत शांततामय मार्गाने आपला विरोध नोंदवण्यास सुरुवात केली आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) च्या आवाहनानुसार मंगळवार, ३० एप्रिल रोजी रात्री ९ पासून ९ .१५ वाजेपर्यंत देशभरातील मुस्लिम नागरिकांनी आपल्या घरी आणि परिसरात लाईट बंद करून हा कायदा रद्द करण्याची मागणी करत निषेध नोंदवला.

शहरातील मुस्लिम बहुल क्षेत्र जामा मस्जिद वार्ड, तातार शहाबाबा वार्ड, ताजपुरा वार्ड, झाकीर हुसेन वार्ड, शाहीन नगर . काजीपुरा , शहा कॉलनी, अ . रहेमान कॉलनी , रहिम नगर, अरब कॉलनी, तसेच नाग चौक व नांदेड रोड वरील प्रतिष्ठाने १५ मिनीटा करिता अंधारमय झाले याआवाहनाला प्रचंड प्रतिसाद दिला गेला. संपूर्ण शहरातील मुस्लिम कुटुंबांनी यावेळी घरातील दिवे बंद करून एकतेचा आणि शांततेचा संदेश दिला.

कोणतीही मिरवणूक किंवा घोषणाबाजी न करता, निव्वळ लाईट बंद करून शांततेत विरोध करण्यात आला. हे आंदोलन एक प्रकारे लोकशाही मार्गाने सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात एक ठोस संदेश देणारे ठरले.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकानुसार, वक्फ कायदा 2025 हा कायदा देशातील वक्फ मालमत्तांवर केंद्र सरकारचा ताबा मिळवण्यासाठी आणला गेला असून, यामुळे धार्मिक स्वातंत्र्य, मालमत्ता हक्क आणि धार्मिक संस्थांच्या स्वायत्ततेवर गदा येणार आहे. त्यामुळे मुस्लिम समाजात अस्वस्थता वाढली आहे.यासंदर्भात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB ) चे अध्यक्ष मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी सांगितले की,

“हा कायदा मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक हक्कांवर आघात करणारा आहे. देशातील शांतताप्रिय मुसलमानांनी कायद्याच्या चौकटीत राहून शांततेत निषेध नोंदवावा, अशी आमची विनंती आहे.” तसेच त्यांनी सर्व धर्मगुरूंना आणि मशिदींना याविरोधात मार्गदर्शन करण्याचे आवाहनही केले. स्थानिक धर्मगुरू, समाजसेवक, युवक आणि विविध संस्था यांनी एकत्र येऊन जनजागृती केली.


या आंदोलनात सहभागी झालेल्यांनी सरकारकडे मागणी केली की, वक्फ कायदा 2025 तत्काळ मागे घेतला जावा आणि वक्फ मालमत्तांवर कोणताही अन्यायकारक हस्तक्षेप होऊ नये.

चौकट:- उमरखेडसह संपूर्ण जिल्ह्यात ‘वक्फ कायदा २०२५’ विरोधात संपूर्ण मुस्लिम समुदायाने केलेला शांततापूर्ण आणि सुसंस्कृत ब्लॅकआउट निषेध, लोकशाही पद्धतीने असंतोष व्यक्त करण्याचा एक सकारात्मक आणि अनुकरणीय प्रकार आहे. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चौकटीत, कोणत्याही हिंसक कृतीचा अवलंब न करता, त्यांनी फक्त १५ मिनिटांसाठी दिवे बंद करून सरकारला स्पष्ट आणि ठोस संदेश दिला.सरकारने हा काळा कायदा ताबडतोब मागे घ्यावा. – मुफ्ती इनामुल्ला खान (जिल्हाध्यक्ष, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड)




