🔥🔥(वेळेचे भान न पाळल्याने नातेवाईकांना बसतोय उष्माघाताचा तडाका; विधींकडेही होतेय दुर्लक्ष)🔥🔥

✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा पारा 43 ते 45 अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे. या कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून अनेक जण आजारी पडत आहेत. अशा परिस्थितीत बौद्ध समाजातील ‘मंगल परिणय’ सोहळे वेळेवर होत नसल्याने नातेवाईक आणि पाहुणेमंडळींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

•वेळेचे गणित कोलमडले!• लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर जरी विवाहाची वेळ सकाळी 11:30 ची असली, तरी प्रत्यक्ष विवाह सोहळा दुपारी 3 वाजेपर्यंत लांबत असल्याचे चित्र दिसून येत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे लांब पल्ल्यावरून येणाऱ्या पाहुण्यांना याचा मोठा फटका बसत असून, उष्माघातामुळे अनेकांची प्रकृती खालावण्याची भीती निर्माण झाली आहे.

चौकट – “उन्हाचा तडाका पाहता लग्नाचे विधी पत्रिकेतील वेळेनुसारच व्हायला हवेत. उशीर झाल्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांची मोठी गैरसोय होत आहे.” — एका संतप्त नातेवाईकाची प्रतिक्रिया.

•विधींच्या लांबीवर नाराजीची• लग्नामध्ये भंतेजी किंवा भारतीय बौद्ध महासभेच्या उपासकांकडून होणारे विधी किमान एक तास चालतात. मात्र, आधीच उशीर झालेल्या लग्नांमध्ये जेव्हा हे विधी सुरू होतात, तेव्हा कडक उन्हामुळे उपस्थितांचे लक्ष विधींकडे राहत नाही. लोक उन्हापासून वाचण्यासाठी सावली किंवा घर गाठण्याच्या घाईत असतात. त्यामुळे अनेक नातेवाईकांनी अशा वेळी विधींसाठी जास्त वेळ घेऊ नये, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. विधी करणाऱ्या व्यक्तींना पाचारण करताना वेळेचे नियोजन अत्यंत कडक असावे, अशी मागणी होत आहे.

•आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज• उन्हाच्या तीव्रतेमुळे लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना सर्वाधिक त्रास होत आहे. लग्न सोहळे नियोजित वेळेत पार पडल्यास पाहुणे मंडळी सुरक्षितपणे घरी परतू शकतील. त्यामुळे समाजातील वधु-वर पित्यांनी केवळ प्रतिष्ठा न पाहता, व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून ‘वेळेवर लग्न’ ही संकल्पना राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





