✍️ करण भरणे सर (बिटरगाव ढाणकी प्रतिनिधी)
उमरखेड तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या कोपाला सामोरे जात आहेत. पेरणीपासून ते कापणीपर्यंत प्रचंड कष्ट घेऊनही नापिकी, अवकाळी पाऊस, दुष्काळ, कीडरोग आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे बळीराजाच्या हातात रिकामेपणच येते. कर्जाचा बोजा आणि घरच्या जबाबदाऱ्या यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी पुढे आले आहेत बिटरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व सर्व पोलीस कर्मचारी बांधव.

समाजातील सर्व घटक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावेत या जाणिवेतून बिटरगाव पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल ५६,००० रुपये जमा करून मदत देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला.
ही मदत केवळ आर्थिक नाही, तर बळीराजाच्या मनात आशेचा किरण जागवणारी आहे. खाकी म्हणजे फक्त कायदा व सुव्यवस्था राखण्याचे प्रतिक नाही, तर संकटाच्या काळात समाजाला आधार देणारी खरी माणुसकीची शक्ती आहे, हे या कार्यातून अधोरेखित झाले आहे.बिटरगाव पोलीस स्टेशनच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा आणि दु:खाशी एकरूप होऊन समाजातील इतर घटकांनाही प्रेरणा मिळणार आहे. आजच्या काळात संवेदनशीलता आणि सहवेदना या गुणांचे महत्त्व कमी होत चालले असताना पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेले हे कर्तृत्व कौतुकास्पदच ठरते.शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारे हे कार्य समाजासाठी एक संदेश आहे की, खरी सुरक्षा फक्त कायद्याच्या अंमलबजावणीत नाही, तर माणुसकी जपण्यात आहे.






